कापल्या जरी आमच्या नसा, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.
शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले. बरोबर फाजलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी निघाला. सिद्दी जौहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. सिद्दी जौहर वेढा उठविल असे सगळ्यांना वाटले. पण पाऊस सुरू होताच वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो, असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला. तो खूश झाला. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकातून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती रात्री दरबारातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रूसैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार. ठरल्याप्रमाणे शिवरायांसारखा दिसणार्या शिवा काशिदची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. शत्रूच्या काही सैन्याचा पहारा सुरू होता. त्यांनी ती पालखी पकडली. शिवाजीराजाच पकडला! असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. मात्र फाजलखानाने ओळखले, हा खोटा शिवाजी आहे. शिवराय हातावर तुरी देऊन निसटले. त्यामुळे सिद्धी अजून चवताळून गेला. सिद्धीचे सैनिक जोराने शिवरायांचा पाठलाग करू लागले. शिवरायांना विशाळगड गाठणे कठीण वाटू लागले. ते बाजी प्रभूला म्हणाले, "बाजी वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची आहे.मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला तोंड देऊ. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, "महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे निघा.उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. त्यांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही इथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरतो. तुम्ही निर्धास्त पणे जा. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले. शिवराय विशालगडाकडे निघाले. शत्रू खिंडी खाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, "बहाद्दूर मर्दांनो, हुशार! जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडापाशी पाय रोवून उभे राहिले. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वा-यासारखे धावत होते. झुंज सुरू झाली. शत्रून खिंड चढू लागला. बाजीप्रभू ओरडला, "हाणा, माऱा." मावळ्यांना स्फुरण चढले. हरहर महादेवची गर्जना करत बांदल शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, "शाब्बास माझ्या पठ्ठ्यानों! ठेचा गनिमांना. होऊद्या जोरात मारा! शब्बास तुमची, मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. शत्रूने बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरी त्यांनी खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला. तो मागे हटला नाही. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता ,तरी मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. तेवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थ कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. महाराज गडावर पोचले, मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो. असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूंनी प्राण सोडला. बाजीप्रभू सारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. 'पावनखिंड' या नावानेच ती इतिहासात अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू!
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment