प्रतापगडावरील पराक्रम
विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. दरबारात महत्त्वाचा प्रश्न पडला होता-'शिवाजीचा बिमोड कसा करायचा?'बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, "सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला?" दरबारात शांतता पसरली. जो-तो आपल्या जागी चूप! शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. तेवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजलखान. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, "शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो."अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार. तुफान ताकतीचा! पोलादी पहार हाताने वागवणारा. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा. अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून आणण्याचा विडा भरदरबारात उचलला. सारा दरबार खूश झाला. अफजलखान मोठ्या ऐटीने,थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. शिवराय त्यावेळी राजगडावर होते. त्यांना अफजलखान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे आणि शिवरायांनी राजगडावरून प्रतापगडाकडे कूच केली.
शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी कळताच खान चिडला. त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही. कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंचच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट.शिवराय प्रतापगडावरून उतरून खाली यावे, म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकुण तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील, असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, "तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देववितो. शिवरायांनी खानाचा कपटी डाव ओळखला. शिवरायांनी खानसाहेबांना निरोप पाठवला. खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून अफजलखान हसला. 'वा! बहुत खुशी!'त्याने शिवरायांचा प्रस्ताव मान्य केला. प्रतापगडाच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक- एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले. शिवराय फार सावधगिरीने वागत होते.
भेटीला जाण्यापूर्वी शिवरायांनी पायात सुरवार चढवली. अंगात चिलखत घातले. त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला. डोक्यात जिरे टोप घातला. त्यावर मंदील बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली. त्याच हाताच्या अस्तित्वात बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. भेटीच्या दिवशी खान शिवरायांच्या आधीच येऊन बसला होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाईही उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियान्याच्या दाराशी जवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकीलाला विचारले, "शिवाजीराजे आत का येत नाहीत?"वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भितात. त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, "या राजे, भेटा आम्हाला." शिवरायांनी खानाला भेट दिली. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली,आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्रकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी खानाच्या पोटात खुपसला. खानाचे आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या घावात त्याला ठार केले. ही खणाखणी ऐकून बडा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायांवर वार करणार, तेवढ्यात जिवाजी महाला धावून आला. बया बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्याला जागीच ठार केले. 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' अशी म्हण पुढे रूढ झाली. यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment